सुखप्रती अॅग्रो बिझनेस प्रा. लि.

  • Home
  • India
  • Jalgaon
  • सुखप्रती अॅग्रो बिझनेस प्रा. लि.

सुखप्रती अॅग्रो बिझनेस प्रा. लि. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सुखप्रती अॅग्रो बिझनेस प्रा. लि., At dabapimpri post holpimpri tal parola dist jalgaon, Jalgaon.

04/06/2018

दादाजी खोब्रागडे नावाची दारुण शोकांतिका.
श्री. दादाजी खोब्रागडे यांचं काल निधन झालं आणि एका अत्यंत प्रयोगशील शेतकरी संशोधकाची दारुण शोकांतिका काळाच्या पडद्याआड गेली. नांदेड नावाच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या खेड्यातील दादाजी खोब्रागडे नावाच्या ७१ वर्षीय वृद्धाची ही डोंगराएवढी छोटी गोष्ट. डोळ्यांच्या पापण्यांच्या कडा ओल्या करणारी. म्हणाल तर कार्पोरेटच काय, कोणत्याही क्षेत्राला यशाचा मूलमंत्र देणारी. विपरीत परिस्थितीच्या व शासनाच्या नावाने सतत गळे काढणाऱ्या, आंदोलनाच्या नावाखाली अत्यंत कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची अपरिमित नासाडी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नव्या पिढीसमोर अविरत कष्टांचा भार सोसणाऱ्या जुन्या पिढीने आदर्श उभा करावा अशी आहे. मोठ्या विलक्षण अशा घडामोडींनी भरलेली आहे ही कहाणी !
अमेरिकेतील फोर्ब्स या मासिकाने नोव्हेंबर २०१० च्या अंकात जागतिक पातळीवरील उद्योग आणि ग्रामीण विकासात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींची यादी प्रसिध्द केली. त्यात महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या एका छोट्याशा खेड्यातील एका अल्पशिक्षित, गरीब व अत्यल्प भूधारकाचे नाव होते. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांचं उत्तर अंतर्मुख करणारं होतं. ‘‘शालं, श्रीफळ, मानपत्र, हारतुरे, मानसन्मान ह्या गोष्टींनी कोण्या गरीब शेतकऱ्याचं पोट भरतं का जी? माझ्या जिवावर अनेक व्यापारी करोडपती झाले, पण मी मात्र जिथे होतो तिथेच राहिलो !’’ अत्यंत व्यथित करणाऱ्या त्यांच्या या उत्तराने एच.एम.टी. या नावाने सुप्रसिध्द असलेल्या भाताच्या अनेक जातींच्या या जनकाची यशोगाथा जाणून घेण्यास मला प्रवृत्त केले.
दादाजी मूळचे चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील नेरी-नवरगाव मार्गावरील खुटाळा येथील. त्यांचा जन्म १९३९ मध्ये झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. ती नंतर इतकी खालावली की उपजीविकेसाठी त्यांना गुरं राखण्याच्या कामाला जुंपून घ्यावं लागलं. दोन एकरांच्या छोटयाशा तुकड्यात भातशेती करत असतांना त्यांच्या तिखट नजरेस तीन अगदी वेगळ्या प्रकारच्या ओंब्या पडल्या ज्यातील तांदूळ अत्यंत बारीक दाणे असलेला, दिसायला आकर्षक आणि चवदार होता. त्यांनी निवड पध्दतीने (सिलेक्शन मेथड) बीजगुणन करून सहा वर्षांनंतर एका नवीन वाणाला जन्म दिला ज्याचे १५ एप्रिल, १९९० रोजी त्या काळातील एका लोकप्रिय घड्याळावरून नामकरण करण्यात आले – ‘एच.एम.टी’. लवकरच दादाजींच्या या वाणाला शेतकऱ्यांनी डोक्यावर उचलून धरले. वाणाच्या लोकप्रियतेमुळे व्यापाऱ्यांचं उखळ पांढरं होण्यास सुरवात झाली असली तरी दादाजींचे वास्तव्य होते एका झोपडीवजा घरात व त्यांच्या मुलावर व सुनेवर मोलमजुरी करून आयुष्यातले दिवस कसेबसे पुढे ढकलण्याची वेळ आली होती. एच.एम.टी. नावाचे आयते बीळ दिसल्यानंतर नागोबांचा सुळसुळाट झाला नसता तरच नवल ! केवळ तिसरा वर्ग शिकलेले अशिक्षित व गरीब दादाजी त्यांच्या अत्यंत मौलिक संशोधनाला कोणत्याही कृषी विद्यापीठाची फुटपट्टी लावून पांढऱ्या कागदावर इंग्रजी भाषेत काळं करू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या वाणाचे श्रेय देण्यास सर्वत्र लालफीत आडवी आली आणि एक दिवस विदर्भातील एका कृषी विद्यापीठाने स्वतःचे नाव लावून हे वाण विकण्यास सुरवात केल्याची अत्यंत धक्कादायक बातमी दादाजींपर्यंत पोहोचली.

या देशात जशी गरिबांची गरिबी वाढत जाते तशीच श्रीमंतांची श्रीमंतीही वाढत जाते. दुर्देवाने श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातात ते गरिबांच्या जिवावर. दादाजींसारख्या एक गरीब शेतकऱ्याच्या जिवावर धानाचे व्यापारी लाखो रुपये छापू लागले आणि संशोधनाचे विनासंकोच श्रेय लाटण्यात कृषी विद्यापीठही मागे राहिले नाही. संशोधकांना प्रोत्साहन न देता त्यांचे पाय ओढायचे आणि कंटाळून ते युरोप किंवा अमेरिकेत गेले आणि त्यांनी तिथे सर्वांना अचंबित करणारे कर्तृत्व गाजवले की ‘ते मूळ भारतीय वंशाचे आहेत’ असं म्हणून निर्लज्जपणे स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि त्यानंतर भर चौकात लाऊडस्पीकर लावून ओरडायचं- मेरा भारत महान ! किती दिवस चालणार ही बौध्दिक दिवाळखोरी?
कितीही अडचणी आल्या तरी दादाजी डगमगले नाहीत. पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात दादाजींची सतत अवहेलनाच होत राहिली. कुणीही त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. पण काहीही झालं तरी अस्सल हिरा जास्त काळ कोळशाच्या खाणीत लपून राहू शकत नाही. ५ जानेवारी, २००५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भव्यदिव्य सोहळ्यात भारताचे तत्कालीन राष्ट्‌पती व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हस्ते एच.एम.टी. ही धानाची नवीन प्रजाती विकसित केल्याबद्दल ५० हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन दादाजींचा सत्कार करण्यात आला. हा दिवस दादाजींच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. एका जगप्रसिद्ध संशोधकाच्या हस्ते एका कृषी संशोधकाचा सत्कार झाला होता !
दादाजींचे कर्तृत्व प्रकाशात आल्यानंतर त्यांच्यावर सत्कार समारंभांचा वर्षाव होऊ लागला. महाराष्ट्र शासनालाही त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्याची सुबुद्धी सुचली व त्यांना २५,००० रु. व ५० ग्रॅम्स वजनाचे सोन्याचे पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. केवळ सत्कारांनी माणसाची उपजीविका चालत नसते. काही दिवसातच दादाजींना आर्थिक विवंचनेने ग्रासले तेव्हा त्यांनी सुवर्णपदक सोनाराकडे गहाण ठेवण्याचे ठरवले. हे पदक सोन्याचे नसून चांदीचे आहे हे कळल्यानंतर दादाजींना धक्का बसला. महाराष्ट्र शासनाने सोन्याचे नकली पदक देऊन एका संशोधकाची घोर फसवणूक केली हे महाराष्ट्राचे व मराठी माणसाचे मोठे दुर्देव !
दादाजींची शोकांतिका इथेच संपत नाही. काही हजारात असलेली पॉलिटेक्निक कॉलेजची फी भरणे शक्य न झाल्यामुळे त्यांच्या नातवाला प्रवेश मिळू शकला नाही. दादाजींनी शोधलेल्या तांदळाच्या नऊ नवीन वाणांमुळे कित्येकांचे जीवन बदलले, पण दादाजींचे दारिद्रय हटले नाही. हारतुऱ्यांच्या वर्षावाला वैतागलेले दादाजी विचारतात. ‘‘सत्काराने काय होते जी? सत्कार करणारे शाल पांघरून झोपवून देतात आणि खायला हाती देतात नारळ ! घरी सहा लोक खाणारे, मग जगायचे कसे?’’ अंतःकरणाला पीळ पाडणाऱ्या या आर्त प्रश्नाने आपणा सर्वांचा आता कायमचा निरोप घेतला आहे.
एका दारूण शोकांतिकेच्या दुर्दैवी नायकाला अत्यंत आदरपूर्वक श्रध्दांजली !

14/03/2018

"शेतकरी कर भरत नाही???" दरडोई करमुक्त उत्पन्न तीन लाख रुपये आहे. सर्व खर्च जाऊन व्यवसायात तीन लाख रुपये राहिले तर कर भरायचा असतो. शेतकऱ्याच्या घरातली कमीत कमी चार पाच माणस शेतात काम करतात. म्हणजे त्या कुटुंबाचे निव्वळ उत्पन्न वर्षाला दहा बारा लाखाच्या वर गेले तर कर बसेल... किती असतं माहीत आहे का? प्राप्तिकर कायद्याच्या नियमाप्रमाणे एकदा व्यवसायात तोटा झाला की आठ वर्षे पुढे नेता येतो. म्हणजे तो तोटा संपेपर्यंत पुढच्या वर्षात फायदा जरी झाला तरी कर भरायचा नसतो. शेतकऱ्याला आयुष्यात सलग किती सीझन ला फायदा होतो? आणि किती सिझन ला तोटा? माहीत आहे का? आपल्याच शेतजमिनीवर उत्पादन घेत राहण्याचा घसारा आणि घरातल्या माणसांचा चोवीस तास बाय मरेपर्यंत पगार मोजला तर कोटी रुपये मिळाले तरी तोटा दिसलं...आत्ताच्या प्राप्तिकर नियमाप्रमाणे.... बाकी सगळे कर व्हॅट, एकसाईज, पट्ट्या शेतकरी भरतोच आणि कुणाला माहीत नसलेला ऊस खरेदी कर पण साखर कारखाने भरतात.. कोण कुठं चोऱ्या करतो आणि कशा करतो हे आम्हाला माहीत नाही का? बापाला कर कायदा शिकवता का? ~ प्रसाद झावरे पाटील (CA)

09/03/2018

💰 _*महाराष्ट्राचा संपूर्ण अर्थसंकल्प (भाग : 2)*_

👉 _*शेतकऱ्यांसाठी काय?*_

▫ जलसंपदा विभागाकरता 8233 कोटी - अपूर्ण पाटबंधारे प्रकल्पापैकी 50 प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

▫ कोकणातील पाटबंधारे प्रकल्पासाठी 60 कोटी तरतूद

▫ जलयुक्त शिवार - 1500 कोटी

▫ 82,000 सिंचन विहिरी पूर्ण - 132 कोटी विहीरींसाठी

▫ मागेल त्याला शेततळे या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण (160 कोटीची तरतूद)

▫ सूक्ष्म सिंचन - 432 कोटी

▫ कृषी विभागातर्फे वनशेतीस प्राधान्य - 15 कोटीची तरतूद

▫ सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटीची तरतूद

▫ फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवड योजना - 100 कोटी

▫ मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेकरीता 50 कोटी

▫ कर्जमाफी - 45.33 लाख कर्जखातेदारांना लाभ देण्याची बँकांना मान्यता (35.68 लाख खातेदारांना रकमेचा लाभ)

▫ 93,322 कृषी पंपाना विद्युत जोडणीसाठी 750 कोटींची तरतूद

▫ गोदामाची योजना, तसेच मालवाहतूक जलद वेगाने व्हावी यासाठी एसटीची नवी मालवाहतूक सेवा सुरु करण्यात येईल, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल

▫ राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार पोर्टलवर आणणार (ई नाम)



▫ विजेवर चालणारी वाहने खरेदी करणाऱ्यांना सूट आणि निर्मिती करणाऱ्याला विशेष सहाय्य देण्यात येईल

▫ सूक्ष्म व लघु उद्योगांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष योजना

▫ राज्यातील काथ्या उदयोग वाढीसाठी - 10 कोटीचा निधी

▫ हस्तकला उद्योगासाठी - 4 कोटी 28 लाख

▫ वर्धा इथे मातीकलेचे मंडळ - 10 कोटी

▫ सामूहिक उद्योग प्रोत्साहनासाठी 2620 कोटी

👉 _*पाणी, कचरा व्यवस्थापन व स्मार्ट सिटीसाठी तरतूद*_

▫ ग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन - राज्यातील 15,000 लोकसंखा असलेल्या गावासाठी नवीन योजना - 335 कोटी

▫ नागरी पाणीपुरवठा, मलनिसारण यासाठी 7,750 कोटी केंद्राची मदत आहे, राज्याकडून 2,310 कोटींची तरतूद

▫ मोर्णा नदी अकोल्यातील नदी स्वच्छता मोहीत नागरिकांनी हाती घेतली, त्यांना मदत करण्यासाठी - 27 कोटी

▫ सागरी किनारा संवर्धनासाठी 9 कोटी 40 लाख

▫ घनकचरा व्यस्थापनासाठी - 1,526 कोटी

▫ ओलव्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मितीसाठी अनुदान देण्याचा मानस - 5 कोटी

▫ स्मार्ट सिटी अभियानासाठी 1,316 कोटींची प्रस्तावित

▫ नागरी पायाभूत सुविधांसाठी - 900 कोटी तरतूद

08/02/2018

Yes.... its reality

01/02/2018

🌾 _*बजेट 2018; शेतकऱ्यांसाठी ‘या’ तरतुदी*_

▫ शेतीच्या कर्जासाठी 11 लाख कोटींचा निधी राखीव

▫ अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी 1400 कोटींची तरतूद

▫ बचत गटांना 42 हजार कोटींवरून 75 हजार कोटी कर्ज देण्याचा सरकारचा निर्णय

▫ कृषी बाजाराच्या विकासासाठी 2 हजार कोटी रूपये वितरीत करणार

▫ मत्स्य व पशुसवंर्धनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी 10 हजार कोटींचे वितरण करणार

▫ राष्ट्रीय उपजीविका अभियानासाठी 5, 750 कोटींची तरतूद

▫ ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी 14.34 लाख कोटी रुपये

▫ ऑपरेशन ग्रीनसाठी 500 कोटींची तरतूद

▫ राष्ट्रीय बांबू मिशनसाठी 290 कोटी रुपये

▫ देशभरात 42 फूडपार्क

👆

30/01/2018

इस्रायल आणि भारत या दोन देशांची तुलना केली तर भौगोलिक आकारापासून कमालीची भिन्नता स्पष्ट होते. जेमतेम 80 लाख लोकसंख्येचा हा देश मुंबईहून छोटा आहे. कृषी क्षेत्रातील प्रगतीबाबत या देशाचे नाव ख्यातकीर्त असले तरी राष्ट्रीय उत्पन्नात शेती उत्पादनांतून मिळणा-या उत्पन्नाचा वाटा केवळ दोन टक्के आहे, हे उल्लेखनीय. येथे तयार होणारी बहुतेक कृषी उत्पादने स्थानिक बाजारपेठेतच खपतात. हा देश काही उत्पादने युरोपात निर्यात करण्यातही आघाडीवर आहे. कृषी क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्याला जगात तोड नाही. हे तंत्रज्ञान जगाला विकण्यावर या देशाचा आता भर आहे. तंत्रज्ञान व नावीन्य यांचा ध्यास इस्रायलच्या शेती क्षेत्रात पदोपदी जाणवतो. पाण्याची कमतरता आणि शेतीला योग्य नसलेली रेताड जमीन या संकटांशी झुंज देत येथे समृद्धीचे मळे फुलले आहेत. शेतीचे अफलातून रूप या देशात बघायला मिळते. तंत्रज्ञानाच्या जोरावर काटेकोर शेती आणि प्लॅस्टिकल्चरचा वापर करून इस्रायल जागतिक यशोगाथा बनला आहे. भारत आणि इस्रायलमधील कृषी देवाणघेवाणीच्या संधी एकमेकांच्या सशक्त बाजू कायम ठेवूनही आणखी वृद्धिंगत होऊ शकतात. शेतकरी किंवा शेती उद्योगाशी संबंधित लोकांनी इस्रायलमध्ये खालील विषयांकडे लक्ष दिले पाहिजे. कारण ही क्षेत्रे दोन्ही देशांच्या दृष्टीने देवाणघेवाणीलाही प्राधान्यक्रमावर आहेत.
अन्न आणि अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, कौशल्ये आणि साधने, पॅकेजिंग, अन्न गोठवणूक तंत्रज्ञान हे विषय या क्षेत्रात येतात. जागतिक अन्न उत्पादनात भारताचा वाटा 12 टक्के असला तरी जेमतेम 2 टक्के उत्पादनांवर आपण प्रक्रिया करतो. इथे आपल्या देशाला केवढी मोठी संधी आहे. उत्पादन, प्रक्रिया, काढणीपश्चात (पोस्ट हार्वेस्टिंग) तंत्रज्ञान, साठवणूक (वातानुकूलित गोदामांसह) आदी क्षेत्रे गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहेत. त्यासाठी इस्रायलमध्ये अत्युच्च तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारतात डेअरी उत्पादने आणि प्रक्रिया क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढता आहे. डेअरी उत्पादनांमधील व्यवसाय वर्षाला 18 ते 20 टक्क्यांनी वाढतो आहे. छोट्या व्यावसायिकांकडून उत्पादकतेत फारसे लक्ष दिले जात नाही. आपल्याकडचे सहकारी तत्त्वावर चालणारे डेअरी उद्योग खराब व्यवस्थापनामुळे रडतखडत सुरू आहेत. त्यातच दुधाची कमी उत्पादकता मारक ठरते आहे. दुग्ध उत्पादक क्षेत्रापुढील हे मोठे आव्हान आहे. इस्रायलची दूध उत्पादकता जगात सर्वोच्च आहे. येथील गाय एका वेतामागे 11 हजार लिटर दूध देते. आपल्याकडे 3 हजार लिटर! उच्च संशोधनातून हे शक्य झाले आहे.
इस्रायलमधील पोल्ट्री उद्योग आज जगात सर्वोत्तम आहे. भारतात या क्षेत्रात अमाप संधी आहेत. येथील पोल्ट्री उद्योगाला गुणवत्तेचे वरदान आहे. आपल्याकडच्या तरुण शेतक-यांनी शेतीला जोडधंदा म्हणून इस्रायली पोल्ट्रीचे अनुकरण केले तर निश्चितच चांगले घडू शकेल. पोल्ट्री खाद्य, उत्पादन, ब्रीडर फार्म, हॅचरीज, व्यावसायिक ब्रॉयलर फार्म्स, कोंबड्यांचे कत्तलखाने, प्रक्रिया, विक्री या प्रत्येक टप्प्यावर भारतातील शेतक-यांना, विशेषत: शेतकरी गटांना शिकण्यासारखे खूप आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वापरायचा, याचा धडा इस्रायलने जगाला दिला. शिवाय मत्स्योत्पादनातही या देशाने कमाल करून दाखवली. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीत नवे मापदंड उभे केले. समुद्राचे खारे पाणी वळवून ‘केजफिश फार्मिंग’ अत्यंत यशस्वी केले. महाराष्ट्राला केवढा मोठा विस्तीर्ण समुद्र्रकिनारा आहे. कोकणातील शेतक-यांनी एकत्र येऊन या क्षेत्रात गुंतवणूक केली तर ती वाया जाणार नाही. भारतात सध्या मासेमारी क्षेत्रात वापरले जाणारे तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि पॅकेजिंगचे तंत्रज्ञान जुनाट आणि अपुरे आहे. इंडिव्हिज्युयल फ्रिजिंग (आयक्यूएफ) सारखे प्रकल्प अलीकडे उभारण्यात आले. मात्र त्यांची क्षमता खूपच अपुरी आहे. प्रचलित गोठवणुकीच्या तंत्राने साठवलेले मासे व आयक्यूएफ तंत्राने साठवलेले मासे यांच्या किमतीत व गुणवत्तेत मोठा फरक असतो. खोल समुद्रातील मासेमारी उद्योग सध्या कच्च्या पायावर उभा आहे. खोल समुद्रात प्रॉन्स, श्रिम्प, टुना, लोबस्टर, कॅटफिश पकडण्यासाठी नव्या तंत्राची गरज आहे. कोकणातील मत्स्योद्योगासाठी असे तंत्र वरदान ठरू शकेल. मोर्चे, आंदोलने करुन मत्स्य उत्पादकांचे किंवा मासेमारी करणा-यांचे प्रश्न सुटणार नाहीत. सूक्ष्म सिंचन हा तर इस्रायलच्या शेतीचा आत्मा आहे. शेतीसाठी सिंचन ही महाराष्ट्राच्या शेतीची मोठी गरज आहे. शेतीच्या सिंचनात महाराष्ट्राचा क्रमांक देशात शेवटून दुसरा आहे.
उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी सूक्ष्म सिंचन उपयोगी ठरणार आहे. इस्रायलसारख्या चिमुकल्या देशाने संपूर्ण जगाला सूक्ष्म सिंचनाचे वरदान दिले. या क्षेत्रात दंतकथा भासतील अशा यशोगाथा रचल्या. या क्षेत्रात भागीदारीच्या संधी व्यावसायिकांसाठी तर अनुकरणाच्या संधी शेतक-यांसाठी आहेत.
इस्रायलमधील कृषी प्रदर्शनात युरोपातील कृषी उद्योगातील अनेक बलाढ्य कंपन्या आपापली उत्पादने मांडत असतात. त्या उत्पादनांची, तंत्राची माहिती नीट समजावून घ्या. केवळ तिथे मिळणारी पत्रके, ब्रोशर्स, पुस्तके मिळवली म्हणजे प्रदर्शन पाहिले असे नाही. शेतक-यांनी आपल्याला हवे असलेले तंत्रज्ञान प्रदर्शनात आहे की नाही ते हुडकून समजून घ्यावे. प्रदर्शन पाहण्यासाठी एक पूर्ण दिवस पुरतो. त्यानंतर शेतक-यांनी फील्ड व्हिजिटवर भर द्यावा. आपल्या दौ-यात आपल्या शेतीशी संबंधित प्रक्षेत्र भेटी (फील्ड व्हिजिट्स) आयोजकांनी ठरवल्या आहेत का, याची आधीच माहिती घ्या. नसतील तर त्या आपल्या गरजेनुसार ठरवून घ्या. आपल्या शेतीसाठी कोणते तंत्रज्ञान अधिक उपयोगी आहे, याची माहिती प्रामुख्याने मिळवा. प्रदर्शनात ती मिळणार नसेल तर स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन ते शोधा. आमच्यासोबत 2009 मध्ये नगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी होते. त्यांनी इस्रायलमध्ये गेल्यावर सगळ्यांसोबत न फिरता डाळिंबांची माहिती घेण्यासाठी तेथे दोन-तीन दिवस खासगी दौरे केले. त्यांच्यासाठी ते इतके महत्त्वाचे ठरले की गेल्या दोन वर्षांत डाळिंब शेतीवरील संकटांमधून या शेतक-यांची शेती वेगळी राहिली. येथून पुढची शेती यांत्रिकीकरणावर आधारित असेल. मजुरांच्या टंचाईमुळे हैराण झालेल्या शेतक-यांनी प्रदर्शनातील कृषी अवजारांची जरूर माहिती घ्यावी. ही उत्पादने विकत घेणे आवाक्यात नसले तरी आपल्याकडील उत्पादकांकडे मागणी करून अशी उत्पादने आपण तयार करवून घेऊ शकतो.

16/01/2018

*अशुद्ध* पाणीपुरी लोकं डोळे मिटून खातात ....
😞😞
पण ....

*वर्षभर* मेहनत घेतलेली माझ्या शेतकऱ्याची भाजी दहावेळा तपासतात....😎😎.....

28/12/2017

जायचं का परत खेड्याकडे?

दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून जेमतेम वाचला. पोरीनं बसून खावं म्हणून तिला मुंबईला कामाला असलेला मुलगा पहिला. दुसरीला मात्र नाईलाजास्तव एका शेतकऱ्याला दिली ते पण तिला काम करावं लागणार नाही या बोलीवर.
पहिली जिला सुखात राहावी म्हणून मुंबईत दिली तिचं काही नवऱ्याच्या पगारात भागेना. पगार चांगला होता आणि वेळच्या वेळी वाढत पण होता पण महागाई काय जवळ येऊ देत नव्हती. नवरा 6 ची ट्रेन पकडतो म्हणून हिची धावपळ 5 पासूनच. धावपळ करूनदेखील काही ताजे नव्हतेच मिळत खायला. गटारावरच्याच भाज्या. पगारात भागत नाय म्हणून मग शिवण मशीन. त्यात पण जास्त पैसे मिळेनात म्हणून मग आणखी असले छोटे मोठे उद्योग करत बस. नवरा काय 9 वाजेपर्यंत पोचायचा नाही रात्री. पोचल्यावर लोकलच्या गर्दीचा सगळा राग बायको आणि पोरांवर. घरात ना कसला संवाद ना शांती. पोरांना इंग्लिश शाळेत टाकलं पण नाव सोडून त्यातही काही विशेष नव्हतंच. आणि तरीही फी मात्र डोळे पांढरे करणारी. यात्रेला, लग्नाला, सणाला गावाला येणं जवळपास बंदच झालं होतं. कारण?? एक असेल तर सांगावं.
दुसरीला नाईलाजास्तव शेतकऱ्याला दिलेली. जेमतेम 3 एकर जमीन. पण मागच्याच महिन्यात पोरानं विक्रमी उत्पादनासाठी कृषी पुरस्कार पटकावला. रोज ची 4 माणसं हाताखाली असतात. शेजाऱ्याची 3 एकर जमीन करायला घेतलेली. काम पडतं थोडाफार पण झोप लागते शांत. पोरं तालुक्याच्या चांगल्या शाळेत जातात. शेत चांगलं पिकतं तरी खूप जास्त पैसे मिळतात असं काही नसलं तरी खर्च भागून उरतातच. भविष्याची पुंजी. कष्ट आहेत पण दगदग नाही. ज्या पोटासाठी मरमर करायची त्यात वेळच्या वेळी तुकडा जातो हे महत्वाचं. सगळे सण, सगळे कार्यक्रम अगदी भपकेबाज नाही पण नटून मिरवते ती पण. कसं जगल्यासारखं वाटतं.
कशासाठी होता शहराचा अट्टाहास? जास्त पैसे, सुख, शांती, समाधान, काम नको जास्त, मुलांचं शिक्षण, पुढच्या पिढ्यांचं कल्याण. जास्त पैसे मिळतात पण मग उरतात किती? सुख-शांती-समाधान म्हणजे काय हे कळण्याइतका तरी असतो का वेळ? 4 तास रेल्वे मध्ये लोंबकळत थांबणं तेही ज्यात श्वास घेऊन घाम यावा इतक्या गर्दीत. असा कितीसा फरक पडतो आजकाल गावच्या आणि शहरातल्या शिक्षणात. पिढी घडतेय तिथे कि बिघडतेय हा मुद्दा उरतोच.
थांबा थांबा. याचा अर्थ शहरात जायलाच नको गावातच बरंय. शहरातच प्रॉब्लेम आहेत गावात नाहीत असं नव्हे. म्हणायचं इतकंच आहे की तुच्छतेने बघावं इतकं वाईट आहे का गावात राहणं? गावी राहणं म्हणजे काय मागासलेपण आहे का? सुख समाधान नाहीच का तिथे? शहरात 10बाय 10 च्या खोलीत राहणारांनी गावाला आल्यावर गावाकडचे येडे आणि आपणच शहाणे असा समज का करून घ्यावा? जेमतेम 10 वि झालेल्या मुलीच्या बापानेपण नाक मुरडावे एवढ वाईट काय आहे शेतकऱ्यांत? "जय जवान जय किसान" चा "नको जवान नको किसान" का झाला?
जास्त अपेक्षा, मोठी स्वप्न असण्यात गैर काहीच नाही. पण कधीकधी आपल्याला नक्की काय हवय आणि नक्की आपण कशाच्या मागे पळतोय याची सांगडंच बसत नाही. उदाहरणार्थ, हवं असतं आयुष्यात स्थैर्य आणि समज असा की जास्त पैसे असलं की ते येतं. आणि मारतो उड्या बिचारा या कंपनीतून त्या कंपनीत. मुलांना "चांगलं" शिक्षण हवं असतं म्हणून मग इंग्लिश माध्यम, वरून सकाळ संध्याकाळ क्लास.... ते बिचारं पोर विचार करायचं, स्वतः शिकायचं विसरूनच जातं आणि मग पुढे 12 वी ला 85% घेणारा पदवीला 40 वर येतो. मुलीला त्रास होईल म्हणून मोठं कुटुंब, एकत्र कुटुंब नको असतं. पण मग कितीही आजारी पडलं तरी पाणी देणारं पण कोणी घरात नसतं. सगळी कामे एकटीलाच पहावी लागतात. आणि यात जास्त त्रास होतो पण हा त्रास बोलताही येत नाही कारण स्वतःच्या हाताने तो ओढवून घेतलेला असतो.
याचबरोबर शहरात स्त्रियांना जास्त स्वातंत्र्य आणि हक्क आहेत असा एक समज जनमानसात प्रचलित आहे. परंतु work force participation हे ग्रामीण भागात जास्त आहे असेच आकडेवारी दाखवते. स्त्रियांचे Political participation देखील ग्रामीण भागातच जास्त दिसते. ग्रामीण स्त्रिया स्वतः प्रत्यक्ष काम करून आर्थिक हातभार लावत असल्याने आर्थिक स्वायत्तता देखील त्यांना जास्त आहे. काही प्रमाणात या गोष्टी qualitatively शहरी भागात जास्त असतील पण quantitatively ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक resourcefulness जास्त आहे हे मान्य करावे लागेल. रायगड जिल्ह्यातील संगमेश्वर येथील सरपंच महिलेने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासोबत जमीन अधिग्रहनाबाबत केलेली bargaining पाहिली आणि ग्रामीण भागात भरीव महिला सबलीकरण होतंय यावरचा विश्वास आणखी दृढ झाला.
वरील उदाहरणावरून दिसून येतंय की मृगजळाला भुलून लोकं शहराकडे पळतायत आणि मग झालेला अपेक्षाभंग दाखवता देखील येत नाही. आणि खरं तर थोडं अंतर्मुख होऊन पाहिलं तर ते सगळं गावात देखील कमीजास्त प्रमाणात साध्य होऊ शकतं. त्यासाठी नक्की काय हवंय आणि जे करतोय त्यातून नक्की तेच मिळतंय का हे पहावं लागणार आहे.
शहरात झगमगाट आहे आणि प्रदूषण पण. शहरात सुविधा आणि तणाव पण. शहरात पैसे जास्त मिळतात आणि तितकेच खर्च पण होतात. शहरात वस्तू हव्या त्या मिळतात पण माणसं तूटतात.
शहरांना पर्याय नाही हेही मान्य पण याचा अर्थ गावात राम नाही असा होत नाही. जे गावात मिळत नाही त्यासाठी नक्की शहराकडे वळा पण जे फक्त मिळतंय असं वाटतं पण प्रत्यक्ष मिळत नाही त्यासाठी मात्र अट्टाहास नको. सगळ्यांना शहरात जाणं शक्य नाही. आणि हळू हळू सगळ्या सुविधा गावापर्यंत पोचल्या आहेत. आता गरज आहे ती ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. शेतीला जोडधंद्यांची जोड, अन्नप्रक्रिया उद्योग, सेवा क्षेत्राचा ग्रामीण भागात विस्तार, MIDC, आधुनिक शेती यामध्ये रोजगारास बराच वाव निर्माण होऊ शकतो.
शहरातील STANDARD OF LIVING च्या जवळपास 70% ग्रामीण STANDARD OF LIVING पण झाले आहे. आता गरज आहे ती या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची. यात मुलींचा आणि त्यांच्या आई वडिलांचा रोल महत्वाचा आहे. शहरातला नवरा असावा अशी अपेक्षा असावी, अट्टाहास नको. PEAK HOURS ला रेल्वे मध्ये लोम्बकळणाऱ्या आणि ट्राफिक मध्ये 2-2 तास गाडी कमी चालवणाऱ्या व ब्रेक जास्त मारणाऱ्यांपेक्षा ठिबक करून शेत पिकावणारा जास्त QUALITY LIFE जगतो हे कुठेतरी मान्य करावं लागेल.
यासाठी सर्वात प्रथम शेतकऱ्यांना त्यांचा जुना social status मिळवून दिला पाहिजे. "शेती उत्तम" हे जुन्या काळात का प्रचलित झाले याकडेही थोडे लक्ष वेधावे लागेल. सुख, समाधान, यश या गोष्टींचे नव्याने अर्थ लावावे लागतील. जगण्याकडे आणि एकूणच सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. Materialism(भौतिकवाद) आणि spiritualism(अध्यात्मवाद) यांचा मेळ घालता आला पाहिजे.
त्याचबरोबर गावांना शहाराप्रमाणे लोकांना स्वप्न दाखवता आलं पाहिजे. ग्रामीण भागात आज काही प्रमाणात स्वप्नांचे पंख छाटायचं काम होतं त्यात बदल झाला पाहिजे. ग्रामीण भागाने स्वतःची अशी एक "चांगल्या जीवनाची" व्याख्या करायला हवी. आणि मग थोडंस नवीन पद्धतीने तिचं marketing करायला हवं. तरच ग्रामीण जीवन येणाऱ्या पिढ्यांसाठी आकर्षक ठरेल.
एवढं केलं तरी आपल्या, भारताच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि मानसिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.
सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं मुळीच नाही. पण काही गोष्टींवर विचार करायची वेळ आलीय हे नक्की.

07/11/2017

लेट्युस हा युरोपियन सॅलेडचा प्रकार आहे. फिकट हिरव्या रंगाचा कोबीसारखा याचा गड्डा असतो. परंतु, हा गड्डा होऊ दिला जात नाही. या भाजी पिकाचे शास्त्रीय नाव ‘लेट्युका सटायव्हा’ आहे. ही भारतातील महत्त्वाची हिवाळी हंगामात येणारी भाजी आहे. भारतातील बहुतेक राज्यांतून मोठ्या शहराच्या परिसरात मर्यादित क्षेत्रात त्याची लागवड केली जाते. उत्तर भारतातील पट्टे, आसाम, बंगळूर,
लेट्युस हा युरोपियन सॅलेडचा प्रकार आहे. फिकट हिरव्या रंगाचा कोबीसारखा याचा गड्डा असतो. परंतु, हा गड्डा होऊ दिला जात नाही. या भाजी पिकाचे शास्त्रीय नाव ‘लेट्युका सटायव्हा’ आहे. ही भारतातील महत्त्वाची हिवाळी हंगामात येणारी भाजी आहे. भारतातील बहुतेक राज्यांतून मोठ्या शहराच्या परिसरात मर्यादित क्षेत्रात त्याची लागवड केली जाते. उत्तर भारतातील पट्टे, आसाम, बंगळूर, हैद्रराबाद, सूरत, अहमदाबाद तर महाराष्ट्रात सातारा, सांगली, पुणे, नगर आणि नाशिक आदी भागांमध्ये प्रामुख्याने या भाजीची लागवड होते. जगात चीन, अमेरिका, स्पेन, इराण, जपान, तुर्कस्थान, मेक्सिको, इटली, जर्मनी आदी देशांत हे पीक घेतले जाते. जगात लेट्युसचे उत्पादन खुल्या शेतात तसेच हरितगृहात गादी वाफ्यावर घेतले जाते. ‘हायड्रोपोनिक्स’ पद्धतीनेही मोठ्या प्रमाणावर लेट्युसचे उत्पादन घेण्याचा कल वाढला आहे.
भारतातील परिस्थिती :
भारतात वा महाराष्ट्रात हे पीक वर्षभर घेता येते व उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात. पारंपरिक लागवड पद्धतीमध्येही उच्च तंत्रज्ञान वापरून कडक उन्हाळ्याचे दोन-तीन महिने सोडल्यास वर्षभर लागवड करता येते.
लेट्युस भाजी खाण्याची पद्धत :
जगभरात लेट्युसच्या निरनिराळ्या जातींच्या, प्रकारांच्या पानांचा उपयोग सॅलड म्हणून आहारात करतात. कच्च्या स्वरूपात पाने बारीक चिरून खाल्ली जातात. अथवा ॲस्परागस, झुकिनी या भाज्यांच्या तुकड्यांमध्ये मिसळूनही उपयोग केला जातो. भारतातही आहारात असाच उपयोग केला जातो.
लेट्युसमधील पोषक द्रव्यांचे प्रमाण :
लेट्युसमध्ये फॉस्फरस, सोडियम, गंधक, मॅग्नेशियम आदी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जीवनसत्त्वे अ, बी-६, क, इ आणि के, प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध तसेच तंतूमय पदार्थ पुरेशा प्रमाणात आढळतात.
लेट्युस भाजीच्या जाती वा प्रकार :
लेट्युसचे बरेच उपप्रकार असून ते असे आहेत.
क्रिस्पहेड किंवा आइसबर्ग
बटरहेड
बिब टाइप किंवा ग्रीन्स
कॉस किंवा रोमेन
स्टेम लेट्युस किंवा सेलेट्युस
क्रिस्पहेड किंवा आइसबर्ग लेट्युस :
हा लेट्युस पूर्वीपासून परदेशात आणि भारतात सर्वांत जास्त प्रमाणात उत्पादनाखालील प्रकार आहे. क्रिस्पहेड किंवा लेट्युस आइसबर्ग म्हणजेच जास्त घट्ट न झालेला कोबीसारखा गड्डा. त्याच्या पानांच्या कडा कुरतडल्यासारख्या असतात.
पाने अतिशय कुरकुरीत, चवीने गोडसर व रसाळ असतात. पाने अतिशय पातळ असतात.
एकंदरीत लेट्युसचा कोणताही प्रकार असो, तो तोंडात टाकल्यावर त्याचा कुरकुरीतपणा अनुभवयाचा! पाने रसाळ असल्यामुळे ती खाताना तोंडातच विरघळतात.
भारतातील स्थानिक बाजारपेठेत आइसबर्ग प्रकारातील गड्ड्यांना मागणी जास्त आहे. भारतात जेथे जेथे परदेशी भाजीपाला लागवडीखाली क्षेत्र आहे तेथे आइसबर्ग लेट्युसची लागवड हमखास असतेच.
बटर हेड लेट्युस :
आइसबर्गच्या खालोखाल या लेट्युसची लागवड केली जाते. या प्रकारात गड्डा तयार होतो; परंतु या गड्ड्यातील पाने जाड, मऊ असून कडा एकसारख्या असतात. पाने कुरकुरीत असून चव गोडसर असली तरी तोंडात टाकल्यावर बटरसारखीच विरघळतात. म्हणूनच या प्रकारच्या लेट्युसला बटरहेड लेट्युस म्हणतात. या गड्ड्यातील पानांची रचना गुलाबाच्या पाकळ्यांच्या प्रकारची असते. या प्रकारात हिरवी लाल तांबूस रंगाची पाने असे दोन उपप्रकार आहेत.
बीब टाइप किंवा ग्रीन्स :
या प्रकारातील जाती आपल्याकडे फारशा लागवडीखाली नसून बाजारपेठेतील मागणीनुसार पिकाचे नियोजन करावे. हा प्रकार म्हणजे बटरहेडसारख्या लेट्युसचा कोवळा गड्डा तयार होत असतानाच तो गड्डा काढला जातो. या गड्ड्यांनाच बिबटाइप लेट्युस म्हणतात.
कॉस किंवा रोमेन :
या प्रकारच्या लेट्युसमध्ये गड्डा तयार होत नाही. परंतू अन्य लेट्युसप्रमाणेच या प्रकारे सुरवातीची वाढ होते. सुरवातीस पाने गुलाबाच्या पाकळ्यांच्या आकारात वाढत असतात. ही पाने चायनीज कोबीप्रमाणे लांब, उभट, रुंद, जाड, कुरकरीत व रसाळ असतात.
स्टेम लेट्युस :
या प्रकारात जमिनीपासून उभट खोड वाढते व त्याला दाटीने पाने येतात. ग्राहकांकडून या प्रकारालाही मागणी असते.
लागवड तंत्रज्ञान :
हवामान : लेट्युस हे पीक थंड हवामानातील आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत या पिकाची चांगली वाढ होते. पानांची प्रत उत्तम असते. १५ अंश सें ते १८ अंश सें. तापमान लेट्युस वाढीसाठी उत्तम असते.
वाढीच्या काळात तापमान २१ ते २६ अंश सेल्सियसवर गेल्यास गड्ड्यावर फुले येवून बी धरण्याचे प्रमाण चालू होते. वाढीच्या काळात तापमान वाढण्यास पानांची चव कडवट होते, तसेच पानांचे शेंडे करपतात. हरितगृहात तापमान व आर्द्रता नियंत्रित करून वर्षभर या पिकाची लागवड करता येते.
जमीन :
भरपूर सेंद्रिय खत असलेल्या, उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या रेताड, गाळवट, पोयट्याच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी चांगल्या असतात. भुसभुशीत मोकळ्या जमिनीत लेट्युसचा गड्डा चांगल्या प्रतीचा व मोठ्या आकाराचा तयार होतो.
लागवडीचे टप्पे : प्रथम जमिनीची उभी-आडवी नांगरट २० ते ३० सेंमी खोलीपर्यंत करून २-३ वेळा कुळवणी करून सर्व ढेकळे फोडावेत. जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळेस एकरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेणखत टाकून मातीत मिसळून घ्यावे, तसेच शिफारस केलेले कीटकनाशक शिफारस केलेल्या डोसमध्ये मातीत मिसळावे. जमिनीचा सामू ५.८ ते ६.६ पर्यंत असावा.
हरितगृहामध्ये लागवड करावयाची असल्यास शिफारस केल्याप्रमाणे माध्यम (कल्चर) तयार करून ते फॉरमॅलिन रसायन द्रव्याने निर्जंतुक करून घ्यावे. त्यानंतर गादीवाफे लागवडीसाठी तयार करावेत. माध्यम तयार करताना त्यामध्ये एकर क्षेत्राच्या हरितगृहात सूत्रकृमीचे नियंत्रण होण्यासाठी शिफारसीनुसार कडुनिंब पावडर मिसळून घ्यावी.
वाफे तयार करणे :
हरितगृहात वा खुल्या क्षेत्रावरील लागवडीसाठी गादीवाफ्यावरील लागवड फायद्याची ठरते. यामुळे पाण्याचा चांगला निचरा होऊन रोपांची जोमदार वाढ व उत्तम प्रतीचा गड्डा मिळण्यास मदत होते. ६० सेंमी रुंद, ३० सेंमी उंच व सोयीप्रमाणे लांब गादीवाफे तयार करून घ्यावेत. दोन गादी वाफ्यांमध्ये ४० सेंमी अंतर ठेवावे.
बियाणे :
लेट्युसचे बियाणे फारच बारीक असून नाजूक असते. एकरी १३० ग्रॅम बियाणे रोपे तयार करण्यासाठी पुरेसे होते. रोपवाटिकेत ९० सेंमी रुंद, ३० सेंमी उंच व तीन मीटर लांब गादीवाफे तयार करावेत. त्यावर चांगले कुजलेले गाळलेले बारीक शेणखत १० ते १५ किलो टाकावे.
शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर पाच सेंमी अंतरावर दोन सेंमी खोल अशा रेषा पाडून बियाणे अतिशय पातळ पेरावे. ते बारीक शेणखताने झाकून घ्यावे. त्यानंतर झारीने प्रत्येक वाफ्यास हलके पाणी द्यावे. त्यानंतर वाफे प्लॅस्टिक पेपरने झाकून टाकावेत. बियांची उगवण ५ ते ६ दिवसांत होते. त्यावेळी प्लॅस्टिक पेपर काढून टाकावा.
प्रत्येक वेळी पाणी देतांना पोटॅशियम नायट्रेट अधिक कॅल्शियम नायट्रेट तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावे. कीडी-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिफारस केलेल्या कीडनाशकांच्या फवारण्या गरजेनुसार ठरावीक अंतराने कराव्यात. २० ते २५ दिवसांत रोपे पुनर्लागवडीस तयार होतात. प्लॅस्टिक ट्रेमध्ये कोकोपिट माध्यम भरून प्रत्येक कपामध्ये एक बी टोकून वरीलप्रमाणे रोपे तयार केली जातात.
लागवड :
गादीवाफ्यावरील व प्लॅस्टिक ट्रेमधील रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यानंतर पुनर्लागवड करावी. गादीवाफ्यांवर लागवड करण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफसा आल्यावर पुनर्लागवड दुपारनंतर करावी.
६० सेंमी रुंद तयार केलेल्या गादीवाफ्यावर दोन रोपांमध्ये ३० सेंमी तर दोन ओळींत ४५ सेंमी अंतर ठेवून एका ठिकाणी एकच जोमदार रोप लावून लागवड करावी. एकरी २६ हजार ६६६ रोपांची लागवड होते.
हरितगृहात याच पद्धतीने लागवड करावी.
पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये लेट्युसची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर ४५ बाय ४५ सेंमी अंतरावर करावी. या पद्धतीत एकरी १९ हजार ७५० रोपांची लागवड होते.
पाणी व्यवस्थापन :
पिकाची वाढ होण्यासाठी आणि उत्तम प्रतीचे उत्पादन मिळण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे. ठिबकद्वारे पाण्यासह विद्राव्य खते रोपवाढीनुसार देता येतात. पिकास दररोज किती लिटर पाण्याची गरज आहे हे निश्चित करून पाणी देण्याचा कार्यक्रम निश्चित करावा.
खत व्यवस्थापन :
हे पीक लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी काढावयास तयार होते. कमी कालावधीचे पीक असल्यामुळे खतांच्या मात्रा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार देणे आवश्यक आहे. एकरी ४० किलो नत्र, ३० किलो स्फुरद, तर ४० किलो पालाश देण्याची शिफारस करण्यात येते. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खतांच्या नेमक्या मात्रा निश्चित करता येतात.
मल्चिंग पेपरचे आच्छादन :
लागवडीपूर्वी गादीवाफ्यावर प्लॅस्टिक मल्चिंगचे आच्छादन करणे फायद्याचे असते. त्यामुळे तणनियंत्रण, जमिनीलगतचे तापमान नियंत्रित राहणे शिवाय बाष्पीभवन कमी होण्याचे प्रमाण वाढते.
आंतरमशागत :
लेट्युस पिकाची मुळे उथळ असल्यामुळे वेळोवेळी तण काढून हलकी खुरपणी करावी. साधारणतः प्रत्येक १५ दिवसांनी माती खुरप्याने हलवून घ्यावी.
पीक संरक्षण :
लेट्युस पिकावरील महत्त्वाच्या कीडी, रोग व त्यांची पिकावरील लक्षणे यांची माहिती अशी.
कीड नियंत्रण :
मावा :
लक्षणे : पिकावर ही कीड मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मावा अतिशय लहान आकाराचे व हिरवट रंगाचे असतात. ही कीड पानातील रस शोषून घेते. यामुळे रोपांची वाढ समाधानकारक होत नाही. तसेच या किडी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. लागवडीच्या क्षेत्रात २०-२५ ओळीनंतर मोहरीची एक ओळ लावल्यास मोहरीच्या पानांवर मावा कीड आकर्षित होते.
रोग नियंत्रण :
स्लायमी सॉफ्ट रॉट
लक्षणे : प्रथम पानावंर तेलकट फुगीर सडके डाग दिसतात. नंतर हे डाग तपकिरी रंगाचे होऊन सर्वत्र पानांवर पसरतात व बुळबुळीत चिकट दिसतात.
नियंत्रण : नियंत्रणासाठी गड्डा लवकर काढून जमिनीत बेताचा ओलावा ठेवल्यास हा रोग आटोक्यात येतो. जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. पिकाची फेरपालट करावी.
बॉटम रॉट :
झाडांच्या जमिनीलागतच्या पानांच्या खालील बाजूस लहान लालसर ते करड्या रंगाचे ठिपके आढळून येतात. ठिपके मुख्य पानाच्या शिरांपर्यंत पसरतात. या ठिपक्यांची जोमदार वाढ होऊन संपूर्ण पान सडण्यास चालू होते.
शिरांमधून करड्या रंगाचा द्रव बाहेर येऊन वाहू लागतो. त्याचप्रमाणे गड्डा चिकट स्वरूपाचा व करड्या रंगाचा होऊन कोसळतो. पानांच्या पेशी लालसर-करड्या रंगाच्या दिसून येतात. उष्ण व दमट हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
नियंत्रण : जमिनीच्या भागातून पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणे अत्यावश्यक आहे. खोड व जमिनीलगतच्या पानांना पाणी देताना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. शिफारस केलेल्या बुरशीनाशकांच्या फवारण्या ठरावीक दिवसांच्या अंतराने गरजेनुसार कराव्यात. उष्ण व दमट हवामान पिकामध्ये स्वीट कॉर्नची मधून-मधून सोबत झाड म्हणून लागवड करावी. या झाडांच्या सावलीमुळे रोगाचे नियंत्रण होण्यास मदत होते.
भुरी (पावडरी मिलड्यू) :
हा रोग उष्ण आणि दमट हवामानात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. रोगाची लक्षणे प्रथम जून झालेल्या पानांवर दिसून येतात. पानांवर ठिपके आढळून येतात. कालांतराने हे ठिपके आकाराने वाढून पानांच्या दोन्ही बाजूस व गड्ड्यावर दिसून येतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पाने निस्तेज होऊन गळून पडतात. पानांच्या भागावर पांढरी पावडरसारखी बुरशी आढळून येते.
केवडा (डाउनी मिलड्यू) :
लक्षणे : या रोगामुळे पानांच्या पृष्ठभागावर फिकट हिरव्या किंवा पिवळसर रंगाचे चट्टे दिसतात. पानांच्या खालच्या बाजूवर केवड्यासारखी पांढरी वाढ झालेली दिसते. नंतर अशी पाने पिवळी पडून वाळून जातात.
रोगप्रतिकारक जातींच्या लागवडीमुळे रोगाला प्रतिबंध केला जातो.
मोझॅक व्हायरस :
हा विषाणूजन्य रोग रोपवाटिकेत रोपांवर दिसून येतो. पानांच्या कडा किंचित आतील बाजूस वळलेल्या असतात. पानांवर पिवळे चट्टे दिसतात. लागवड केल्यानंतरही मोठ्या पानांवर हा रोग दिसून येतो. पिवळसर रंगाचे चट्टे पानांच्या शिरांमधील भागांत आढळून येतात. कालांतराने पाने पिवळी पडून प्रादुर्भाव झालेली दिसतात. अशी झाडे उपटून नष्ट करावीत.
लेट्युस गड्ड्यातील विकृती :
टिपबर्न :
लक्षणे : या विकृतीमुळे पिकाचे खूपच नुकसान होते. ही विकृती गड्ड्यातील अंतर्गत पानांच्या वरच्या बाजूस तसेच गड्डा झाकलेल्या पानांवर आढळून येते. प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास संपूर्ण गड्ड्यातील पाने सडू लागतात आणि गड्डा विक्रीस अयोग्य होतो. या विकृतीचा प्रादुर्भाव गड्डा काढणीच्या अवस्थेत आढळून येतो.
जमिनीचे तापमान आणि हवेतील तापमानामध्ये जेव्हा जास्त फरक असतो तेव्हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कॅल्शियमची कमतरता असल्यास ही विकृती दिसून येते. जमिनीचा सामू ५.५च्या खाली (आम्ल धर्मी) असल्यासही प्रादुर्भाव आढळतो.
नियंत्रण : या विकृतीच्या नियंत्रणासाठी पाणी अतिशय काळजीपूर्वक द्यावे. विकृतीला प्रतिकारक जातींची लागवडीसाठी निवड करावी. लागवडीआधी माती परीक्षणाच्या अहवालानुसार कॅल्शियम क्लोराइड एकरी १० किलो द्यावे. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असावा.
पीक काढणी :
नुसत्या पानांच्या (लिफलेट्यूस) जातीच्या लेट्युसची काढणी पाने कोवळी असतानाच करावी.
गड्डा लेट्युसची काढणी गड्डा पूर्ण तयार झाल्यावर करतात. गड्डा काढतांना जमिनीच्या थोडे खाली धारदार चाकूने कापून काढतात. अंदाजे ४५० ते ५०० ग्रॅम वजनाच्या गड्ड्यांची काढणी करावी. एकरी १२ ते १३ टन विक्रीलायक गड्डे मिळतात. गड्ड्यांवर सकाळी दव आढळून आल्यास दवाचे प्रमाण कमी झाल्यावर काढणी करावी.
पॅकिंग :
लेट्युसचे गड्डे पॅकिंग शेडमध्ये आणून आकार, वजनांप्रमाणे त्यांची प्रतवारी करावी. वायुविजनासाठी असलेल्या छिद्रांच्या कोरूगेटेड बॉक्सेसमध्ये दोन डझन गड्डे दोन थरांमध्ये पॅक करून बाजारपेठेत पाठविता येतात.
बॉक्सेसमध्ये गड्डे भरताना बॉक्सेसच्या तळाकडील भागात गड्ड्यांच्या खोडाकडील बाजू ठेवावी, तर दुसरा भाग भरण्याच्या वेळी पहिल्या थरावर गड्ड्याची वरची बाजू ठेवावी व पॅकिंग करावे. यामुळे मालाला वाहतुकीमध्ये इजा होणार नाही.
प्री कूलिंग व कोल्ड स्टोरेज :
पूर्व शीतकरण (प्री कूलिंग) व शीतगृह (कोल्ड स्टोरेज) यांची सुविधा असल्यास उत्तम. अशा ठिकाणी गड्ड्यांची प्रतवारी व पॅकिंग केल्यावर बॉक्सेस पूर्व शीतकरण करण्यासाठी शून्य ते दोन अंश से. तापमान व ८० ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रतेत ठेवावेत. शीतगृहात लेट्युसचे गड्डे तीन ते चार आठवड्यांपर्यंत शून्य अंश से. तापमान आणि ९० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रतेमध्ये साठवून ठेवता येतात.
संपर्क : डॉ. अरूण नाफडे, ९८२२२६११३२
(लेखक पुणेस्थित उद्यानविद्या तज्ज्ञ आहेत)

Address

At Dabapimpri Post Holpimpri Tal Parola Dist Jalgaon
Jalgaon
425111

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुखप्रती अॅग्रो बिझनेस प्रा. लि. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share